जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरातील 22 वर्षीय सेंट्रींग काम करणार्या तरुणान गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, 2 मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, तरुणाने आत्महत्या मित्रांकडून सुरू असलेल्या पैशांच्या तगाद्यामुळे झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोरख अशोक कोळी (22, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
गोरख कोळी हा आई, लहान भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता व बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रीग काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. गोरख कोळी हा त्याच्या मित्र सोनू कोळी याच्यासोबत राहत होता. सोमवार, 2 मे रोजी घरी कुणीही नसतांना गोरखने राहत्या घरात दुपारी 4 ते 5 वाजेच्या सुमारास ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणार्यांच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांना कल्पना देण्यात आली.
गळफास देण्यात आल्याचा आरोप
गोरख कोळी यांचे मामा प्रल्हाद कोळी हे रामेश्वर कॉलनीत राहतात. गोरखने आत्महत्या केली असून त्याला गळफास देण्यात आला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला. गेल्या काही दिवसांपासून गोरखचा मित्र सोनू कोळी आणि इतर दोन जण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होते. पैसे दिले नाही म्हणून तिन्ही मित्रांनी संगनमताने त्याला गळफास दिल्याचा आरोप मयत गोरखची आई आक्का आणि मामा प्रल्हाद कोळी यांनी केला. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.